Monday, July 16, 2018

अभंगाची दिंडी - दिवस १२


संत ज्ञानेश्वर माऊली

जैशी स्वप्ना स्वप्नीं महिमा । तमीं मानू असे तमा । तेंवि अज्ञाना गरिमा । अज्ञानींचि ॥३॥
कोल्हेरीचे  असिवारु । न येती धारकीं धरुं । नये लेणां शृंगारु । वोडंबरीचा ॥४॥
हे जाणणेयाच्या घरीं । खोंचिलेंही आन न करी । काई चांदिणां उठे लहरी । मृगजळाची ॥५॥
आणि ज्ञानहि जें म्हणिजे । तें अज्ञानचि पां दुजें । एक लपऊनी दाविजे । एक नव्हे ॥६॥
अमृतानुभव
आत्मज्ञानाचे महत्त्व सांगताना माऊली म्हणतात.
स्वप्नाचे महत्त्व स्वप्नातच, आणि अंधाराचे महत्त्व अंधारातच त्याचप्रमाणे अज्ञानाची थोरवी अज्ञानातच. मातीचे घोडे रणांगणावर नेता येत नाही. मंत्राने केलेले (खोटे)  दागिने घालून मिरवता येत नाही. त्याचप्रमाणे अज्ञानाला ज्ञान म्हणून मिरवता येत नाही. चांदण्यांमुळे (चंद्रामुळे) मृगजळाला लाटा निर्माण होतात का? ही सर्व उदाहरणे देण्यासाठी उच्चकोटीची बुद्धिमत्ता लागते (आधी मृगजळ त्यात लाटा) पण माऊली त्याहूनही एक वाक्य सांगून स्वःताची अलौकिक बुद्धिमत्ता दाखवून देतात.
ज्याला आपण ज्ञान म्हणतो ते पण एक अज्ञानच आहे. ज्ञान आणि अज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

कोल्हेरी: कृत्रिम मातीची चित्रे
असिवार: घोडेस्वार
धारकी धरणें- मोठ्या संकटांत, पेचांत आणणे
वोडंबरी: गारुडविद्या; जादूगिरी

No comments:

Post a Comment