Thursday, November 29, 2018

तामिळनाडू २०१८ -भाग - ५

सहलीचा कळस, मंदिराचा कळस, चोल राजवटीचा कळस

१३ नोव्हेंबरला कुंभकोणम सोडलं. तंजावरजवळच होतं. ९,९ः३० ला तंजावरला पोहचलो. हॉटेलवर सामान टाकले व  बृहदेश्वर बघण्यासाठी निघालो. हे मंदिर म्हणजे चोल राजाच्या राजवटीतील सर्व मंदिराचा स्थापत्यांच्या दृष्टीने कळसच आहे.
या मंदिरात मदुराईचे नायक, तंजावरचे मराठे व विजयनगरच्या राज्यांनी थोडी फार भर घातली पण त्यांनी चोला राजाच्या वैशिष्टयात काही बदल केले नाहीत.
हे मंदिर चोला राजा राजा १ (९४७-१०१४) ने बांधले आहे. त्यांने ९८५ ते १०१४ असे तीस वर्ष राज्य केले. याच राजाने चोला राज्याला सुवर्णकाळ दाखवला. हे मंदिर १००३ ते १०१० अशा विक्रमी सात वर्षात बांधले गेले. मंदिराला अनेक वैशिष्ट्ये आहेत. या मंदिराचा कळस म्हणजे कळसच.
या मंदिराला दोन गोपूरे आहेत. पहिले  गोपूर आहे पाच मजली आहे. हे राजा राजा २ यांनी बांधले. आतील गोपूर तीन मजली आहे. हे राजा राजा १ यांनी बांधले. बाहेरील गोपूर मोठे व आतील लहान का? हा प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक आहे. पण त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही शोधण्यात जास्त गंमत आहे.
पहिल्या गोपूरावर अनेक मुर्ती व वेगवेगळे प्रसंग कोरलेले आहेत. शंकर आणि कालीमाता यांच्यातील नृत्यस्पर्धेचे चित्र आहे. ही गोष्ट खरच खूप मनोरंजक आहे. वेळेच्या अभावी ती सांगत नाही.
या गोपूराचा भार खूप जास्त आहे. आणि आधी सांगितल्याप्रमाणे हे सात वर्षात बांधलेलं मंदिर आहे म्हणून मंदिर बांधणाऱ्या स्थापक शास्त्रज्ञांनी हा भार सांभाळण्यासाठी दोन भिंतींचा वापर केलेला आहे. हीच पद्धत मंदिराच्या कळसासाठी पण वापरली आहे.
आपण आत गेल्यावर महा अजस्त्र असा नंदी आहे. त्यांच वजन २५ टन आहे. हा नंदी चोला राजांचा  नसून, तो विजयनगरच्या साम्राज्याने बांधलेला आहे. मंदिराच्या बाहेर असण्या-या नंदीच्या मंडपावर निळ्या रंगाची नक्षी तंजावरच्या भोसल्यांनी काढलेली आहे. सहसा जुन्या चित्रात निळ्यारंगात नक्षी बघायला मिळत नाही.


  हा नंदी एवढा मोठा का? त्यासाठी मंदिराच्या आतील लिंगाचा आकार बघावा लागेल.   शंकरांची पिंड १३ फूट उंच आणि अकरा फूट परिघ असलेली आहे. ही जगातील सर्वात मोठी पूजा  केली जाणारी पिंड आहे. एवढ्या मोठ्या देवासाठी एवढ्या मोठ्या नंदीची गरजच आहे. हो की नाही? मंदिराच्या गाभा-याचा दरवाजा मात्र पिंडीपेक्षा लहान आहे.  मग पिंड आत कशी नेली? का आधी पिंड मग दरवाजा?
मंदिराविषयी सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत पण वेळेअभावी मी त्यातल्या फक्त तीनच अतिशय महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे.

कळस
मंदिराचा कळस म्हणजे मला वाटतं राजाच्या वैज्ञानिक कल्पकतेचा उच्चांक आहे. चोला राजाच्या पद्धतीनुसार कळसाची उंची प्रचंड आहे. जी गोपूरापेक्षा ही जास्त आहे. कळसावर दिसणारा हा घुमट साधारण अठरा टनाचा आहे. प्रश्न हा आहे की अठरा टनाचा हा घुमट चढवला कसा असेल?


त्यासंबंधी दोन शक्यता आहेत. एक तर प्रवणमार्ग किंवा चढण ( मराठीत रॅम्प) बांधायचा. पिरामिडवगैरे साठी हीच पद्धत वापरली जाायची. कळसाची उंची साधारण १०० फूट आहे. त्यासाठी प्रवणमार्ग  ७ कि.मी. लांब बांधावी लागली असेल. दुसरी शक्यता म्हणजे मंदिराच्या चारी बाजूने विटाचे बांधकाम करायचे (थोडे अंतर ठेवून). जशी मंदिराची उंची वाढेल तशी त्या विटाची उंची वाढवायची. विटांची भिंत व मंदिर यामध्ये वाळू भरायची. या पद्धतीत मंदिराच्या लेण्यांवर काम करणा-या कारागिरांसाठी वाळूत उभा राहून काम करणे अतिशय सोपे जाते. हळूहळू मंदिर व विटाच्या भिंतींची उंची वाढवत जायची. ही पद्धत दक्षिणेत मंदिर      बांधणा-यांच्यात जास्त लोकप्रिय होती. मंदिर बांधण्यासाठी लागणारा काळ बघता, दुस-या पद्धतीचा उपयोग झाला असावाअसे वाटते. या विषयातील तज्ञ यावर जास्त प्रकाश टाकू शकतील. पण हा घुमट म्हणजे आपल्या स्थापत्यशास्त्राच्या प्रगतीचे दर्शन घडवणारा आहे.
हा कळस आतून पोकळ आहे असं म्हणतात पण त्यासाठी मंदिराच्या आतून बघावे लागेल. ते शक्य नव्हते.  हा अजस्त्र कळस उभा करण्यासाठी भिंतीचा पाया खुप खोल लागेल. परंतु कमी वेळ असल्यामुळे मंदिर     बांधण्या-यांनी वेगळीच युक्ती वापरली आहे. ती म्हणजे चार ऐवजी आठ भिंती. एका दिशेला एकाऐवजी दोन भिंती बांधल्या व त्यामध्ये थोडी जागा ठेवली. भौतिक शास्त्राच्या नियमाप्रमाणे अशावेळेस  प्रत्येक भिंतींवरचा भार एकदम कमी होतो. गोपूराला पण हीच पद्धत वापरली आहे.
कळसावर कैलासाचे शिल्प कोरले आहे. त्यामुळे मंदिरात शिरताना आपण कैलासात गेल्याचा भास होतो. म्हणजे जिवंतपणी कैलासवासी.

बाहेरील भिंतींवरील लिखाण
सर्वसाधारणपणे आपल्याकडे मंदिर किंवा लेणी केव्हा बांधली यांचा अंदाज करावा लागतो. तो साधारण शतकात असतो. म्हणजे ७व्या शतकातील मंदिर. पण या मंदिराबाबत असं करण्याची गरज नाही. राजा राजाने हे मंदिर केव्हा बांधायला सुरवात केली? केव्हा बांधून झालं? यांची पूर्ण माहिती कोरुन ठेवली आहे. खालील चित्र पहा.
 येथे असे १०००च्या वर परिच्छेद आहेत.
यामध्ये मंदिराचे उत्पन्न, खर्च, ताळेबंद कसा करावा यांची माहिती दिली आहे. या मंदिरासाठी कुणी व किती देणगी दिली हे लिहलेले आहे. यामध्ये अनेक राजवंशीय स्त्रियांचा उल्लेख आहे. राजा राजा १ च्या काळात स्त्रियांना मालमत्ता स्वःताच्या नावाने विकत घेता व देता येत होती. आज पासून १००० वर्षापूर्वी. जरा विचार करा त्यावेळी इतर देशातील स्त्रियांची अवस्था काय होती!
या भिंतीवर कोणते सण, उत्सव साजरे करावेत याबद्दल पण लिहले आहे. भारतीयांमध्ये लिहण्यापेक्षा पाठ करुन गोष्टी पुढच्या पिढीला देण्याची मानसिकता जास्त होती.  तिथे ही उदाहरणे म्हणजे हाताच्या बोटावर (एकाच हाताच्या) मोजण्याइतकीच आहेत.  भारतात माझ्या माहितीप्रमाणे सम्राट आशोकांनतंर राजा राजा१ हा एकमेव राजा होऊन गेला, ज्याने इतक्या बारकाईने लिखाण करुन ठेवले आहे.


इतर वैशिष्ठे

मंदिराच्या मागे गणेशाचे मंदिर आहे. या मंदिरासाठी तंजावरच्या भोसल्यांनी मदत केली होती. या मंदिराच्या भिंतीवर त्याबद्दल माहिती वाचायला मिळती. आणि ती पण मराठीत. हे छायाचित्र पहा. मराठी माणूस कुठं पर्यत पोहोचला होता!



मंदिराच्या दक्षिणेला एक लेणं आहे. त्यांच चित्र खाली देत आहे.

परदेशी पाहुण्याचं चित्र या मंदिरावर कसं याच उत्तर इतिहासाला माहीत नाही. हे लेणे आधीपासून होतं  का नंतर केव्हा बसवलं याच संशोधन होणं गरजेचे आहे.

मंदिराबद्दल सांगण्यासारख्या खुप गोष्टी आहेत जसं चंडिकेश्वर- उपदेवता, शंकर काली नृत्य स्पर्धा, बाहेरील तटबंदी पण वेळेच्या अभावी त्यांची माहिती देत नाही.

१२ः३० पर्यंत मंदिर बघून झाले होते.  त्यानंतर मराठा दरबार, सरस्वती ग्रंथालय बघायला गेलो. येथील सरस्वती ग्रंथालय जगभर प्रसिद्ध आहे. इंग्रजांचे व तंजावरच्या शेवटच्या भोसल्यांचे संबंध बरेच चांगले होते. ज्या वेळेस राज्य खालसा करायची वेळ आली त्यावेळेस भोसल्यांनी इंग्रजांना एक विनंती केली, त्यांनी इंग्रजांना सांगितले की या सरस्वती ग्रंथालयातील एकाही पुस्तकाला इंग्रजांनी हात लावून नये. त्याप्रमाणे इंग्रजांनी त्यांची विनंती मान्य केली व या ग्रंथालयाच्या एकाही पुस्तकाला इंग्रजांनी हात लावला नाही. या ग्रंथालयात आजही अनेक दुर्मिळ पुस्तके आहेत. त्या काळात मोडी भाषेत पत्रव्यवहार चालायचा. ती सर्व कागदपत्रे आज ही जपून ठेवलेली आहेत. मला वाटतं त्यातील कित्येक कागद अजून वाचले पण गेले नसतील. ते वाचले तर मराठा इतिहासातील अनेक गोष्टीवरील पडदा उघडला जाईल. मराठा दरबारांचे नूतनीकरण चालले असल्यामुळे त्या दरबारातील सर्व वस्तू वरती ठेवल्या होत्या. तेथे तंजावर या विषयावर एक माहितीपट दाखवला जातो. पण हा कार्यक्रम पूर्णपणे तामिळ भाषेत होता. त्यामुळे तो काहीच समजला नाही. मला मराठा दरबार, सरस्वती ग्रंथालय याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. मी माझ्या सहलीतला एक पूर्ण दिवस यासाठी राखून ठेवला होता. पण दोन ते तीन तासात हे सर्व बघून झाले. एकतर हा सर्व भाग उपेक्षित आहे असं मला वाटतं. जेवढे लक्ष या ठिकाणी द्यायला पाहिजे होतं तेवढं लक्ष दिले गेलेले नाही. येथील बृहदेश्वर मंदिर अप्रतिम होतं आणि या मंदिरामुळे येथील माझा एक दिवस अगदी सत्कारणी लागला.
बरेच दिवसापासून पेपर डोसा खाण्याची इच्छा होती म्हणून मागवला. तो हा असा आला.
 

आचा-याला जाऊन बक्षिशी देण्याची इच्छा होती पण नंतर हा डोसा घशातून उतरला नसता म्हणून ती बक्षिशी वेटर (मराठी शब्द?  वाढप्या)मार्फत पाठवली.
दुस-यादिवशी काय बघायचं हेच ठरवत होतो. आयत्यावेळेची बघण्याची ठिकाणे माझ्याकडे होती. कालीमेरे (Calimere) नावाचे एक पक्षी अभयारण्य जवळच होतो. पण त्यावेळेस 'गज' नावाचे वादळ येणार असल्याची पूर्वसूचना मिळाल्यामुळे तो बेत रद्द केला.
१४ नोव्हेंबरला अनाईकराई (Anaikarai) ६० किलोमीटरवर असलेल्या कावेरी नदीवरील हे धरण पहायला गेलो. हा भाग अतिश्य निसर्गरम्य आहे. तेवढ्यासाठी जाऊन बघण्यासारखे  नसला तरी वेळ असल्यास बघण्यासारखे  आहे. विषेश म्हणजे धरणाची भिंत ही वाहतुकीसाठी खुली आहे.
यरकौड (Yercaud) या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी १५ नोव्हेंबरला तंजावर सोडले. ते पुढच्या भागात....

Monday, November 26, 2018

तामिळनाडू २०१८ -भाग - ४

गाणारा समुद्र आणि नाचणारा शंकर

१२ नोव्हेंबरला कुंभकोणम सोडलं परत येण्यासाठी. तेथून मयलाधुराई (Mayiladuthurai)  म्हणून जवळच असणा-या गावात गेलो. तेथून तरंगबडीला (Tharangambadi) बस असतात अस कळलं. तरंगबडीची बस मयलाधुराईच्या दुस-या स्थानकावरुन सुटते. ते स्थानक जवळच होते. चालतच त्या बसस्थानकावर गेलो. तेथून कराईकलची बस पकडली. कराईकलला जाणारे दोन मार्ग आहेत. एक तरंगबडी मार्गे तर दुसरा नालादाई(Nalladai) मार्गे. आम्ही पहिला मार्ग निवडला.
तरंगबडीला डच वसाहत होती. १६२० ला डच येथे आले, त्यांनी मदुराईच्या नायकांबरोबर (बहुदा रघुनाथ) करार केला व येथे किल्ला बांधला. त्यावेळेस त्यासाठी रु. ३१११/वर्ष असा करार झाला. ही रक्कम त्याकाळी फारच मोठी होती. त्यामुळे डचांना ८ कि.मी लांबी  ४ कि.मी. रुंदीची जागा मिळाली. त्यांनी तेथे दन्सबोर्ग (Dansborg) नावाचा किल्ला बांधाला.


सोन्याच्या पट्टीवर झालेला करार

डचांचा अंदाज होता, हे क्षेत्र व्यापारासाठी, जहाज वाहतुकीसाठी उपयोगी पडेल. त्यानुसार त्याकाळात अनेक जहाजे, मिशनरी या भागात आले. त्यांची पूर्ण माहिती किल्ल्यात आजसुद्धा पहायला मिळते. खालील फोटोमध्ये त्याकाळात या किल्ल्यावर थांबलेल्या जहाजांची माहिती मिळते.




हा किल्ला पुर्णपणे डच पद्धतीमध्ये बांधला आहे. डचांनी येथे त्याकाळात छापखानापण सुरु केला होता. त्यात तामिळमध्ये बायबल छापले जायचे. हा भारतातील पहिला छापखाना आहे.  किल्ला व वस्तुसंग्रहालय छान आहे.  हळूहळू कोलकत्याचा वापर वाढल्याने हे फार मोठे बंदर म्हणून डचांना विकसित करता आले नाही.  १८४५ मध्ये हा किल्ला डचांनी इंग्रजांना विकला.


तरंगबडी म्हणजे जेथे लाटा गातात ते गाव. आणि खरोखरच येथील लाटा गाणं म्हणत आहेत असं वाटत. समुद्रकाठ फारच छान आहे. मस्तपैकी दोन चार तास बसण्याची (???) इच्छा होती.






पण गाणा-या समुद्रानंतर नाचणारा शंकर बोलवत असल्याने अर्धा तासातच परत निघावे लागले.
तेथून तडक (डायरेक्ट मराठीत) चिदंबरमची गाडी मिळाली. जेवण करुन साधारण १ः३० वाजले होते. १ ते ४ मंदिर बंद असणार म्हणुन जवळच असलेल्या पिचावरम या गावी जायचं ठरवले. पिचावर, समुद्रतटीय वनस्पतीच्या (Mangrove forest) जंगलासाठी प्रसिद्ध आहे. तामिळनाडू पर्यटन विभागाने येथे नावेची(boat) सोय ठेवली आहे. एक,दोन, चार तास अशी नाव आरक्षित करता येते. दोन तासाची नाव आरक्षित करणे फायद्याचे आहे. नावेत बसल्यावर नावाड्याला १०० रुपये देउन नाव जोरात चालवायला सांगा म्हणजे तुम्ही ख-या अर्थांनी समुद्रतटीय वनस्पतीचे जंगल बघू शकता. नाव त्या जंगलामधून जाते. हा चित्तथरारक अनुभव आहे. नेहमीप्रमाणे स्वसंरक्षणांची साधने [स्वसंरक्षक जाकीट (life-jackets)] अद्ययावत नाहीत. त्यामुळे येथे जरा जपूनच प्रवास केलेला बरा. पिचावरमला निरीक्षण मनोरा [यापेक्षा चांगला मराठी शब्द सुचतो आहे का?? वॉच टॉवर]  आहे. त्यावरुन जवळपासचा निसर्ग छान दिसतो. छायाचित्र काढण्यासाठी योग्य असे ठिकाण.






पिचावरमचा मनसोक्त आनंद घेतल्यावर चिंदबरमला परत आलो. वेळ साधारण ५, ५ः३० ची होती. येथील आरती बघायला मिळाली.
शंकराची नटराजाची मूर्ती बघायला मिळेल असं वाटले होतं. पण देवाला घातलेल्या असंख्य दागिन्यामुळे तो नटराज आहे हेच मला कळेना. जवळच उभ्या असलेल्या एका तरुण व्यक्तीला विचारलं "हेच मुख्य मंदिर का?” “हो” त्या व्यक्तीचं उत्तर. त्यांच्याशी बोलता बोलता त्यानं आपल नाव 'श्रीनिवास' सांगितले. श्रीनिवासने मला खुप माहिती दिली. जस की मुख्य मंदिरातील पुजारी स्फटिक लिंगाला अभिषेक घालतो आहे. कधी दूध, मध, दही तर कधी भस्म. श्रीनिवास माहिती सांगत होता. मी अतिशय लक्षपूर्वक ऐकत होतो. स्फटिक मूर्तीला अभिषेक झाला की जवळच असलेल्या विष्णूची आरती सुरु होईल. ती पूर्ण झाल्यावर नंतर थोड्या वेळाने नटराजाची आरती सुरु होईल. मग तो मला विष्णू मंदिरापुढे घेऊन गेला. आरती सुरु झाली, संपली. देवाला नैवेद्यपण झाला. जवळपास माझ्यासारखे सर्वजण विष्णू मंदिरातून नटराज मंदिराकडे फिरुन आरतीची वाट पाहू लागले. पण श्रीनिवास मात्र विष्णूसमोरच उभा होता. थोड्यावेळात विष्णू मंदिराचे दार उघडले, हा दर्शनपण घेऊन आला. तोपर्यंत नटराजाची आरती सुरु झाली नव्हती. श्रीनिवासने परत एकदा विष्णूला नमस्कार केला आणि मंदिराच्या बाहेर पण पडला. थोडंसं विचित्र वाटलं. एखाद्याची श्रद्धा फक्त आणि फक्त विष्णूवरच असू शकते हे समजुन घेण्याएवढा समंजसपणा माझ्यात आला होता. शैव व वैष्णव यांच्यातील वाद बहुतांशी संपला असला तरी असा कधी तरी दिसतो. असो.
 नटराजाची साग्रसंगीत आरती झाली.  शिवाची लिंगाच्या स्वरुपात अनेक मंदिरे आहेत. पण मूर्तीच्या स्वरुपात फारच कमी मंदिरे आहेत. नटराज हे त्यापैकी एक.  आधी सांगितल्याप्रमाणे स्फटिक लिंगाच्या स्वरुपात पण देवाची पुजा होते. ते स्फटिक लिंग आपल्याला सहसा बघायला मिळत नाही. आरतीची वेळ असल्यामुळे ते लिंग पाहण्याचे सौभाग्य आम्हाला मिळाले. आरतीमुळे मन अतिशय प्रसन्न झालं. पण तोपर्यत घड्याळात किती वाजले हे बघायचं राहून गेलं. आणि लक्षात आलं अरे, ७ वाजले. अजून आपल्याला कुभकोणमला परत जायचे आहे. मग बसस्थानकावरून आम्ही परत कुभकोणमला आलो. रात्रीचे १० वाजले होते. उपाहारगृह चालू होती. डोसा खाऊन झोपलो. उद्या आणि परवा आम्ही तंजावरला जाणार होतो. चोलाराजच सर्वात उत्तम मंदिर व मराठा दरबार बघायला. हे सर्व पुढच्या लेखात

Saturday, November 24, 2018

तामिळनाडू २०१८ -भाग - ३

प्रलयानंतर प्रथम जीवसृष्टी निर्माण झालेलं शहर म्हणजे कुंभकोणम.

११ नोव्हेंबरला सकाळी आम्ही श्रीरंगम् सोडले व कुंभकोणमला दुपारी बारा वाजता पोहचलो. जेवण करून मंदिर बघण्यासाठी तयार झालो. तोपर्यंत तेथील लोकांनी सांगितले की तमिळनाडूतील सर्व मंदिरे ही एक ते चार बंद असतात. पुण्यातील एक  दुकान दुपारी बंद असते तर काय विनोद होतात! येथे तर मंदिरे बंद असतात म्हणजे किती विनोद तामिळभाषेत होत  असतील?
 दुपारची थोडी विश्रांती घेऊन साधारण दोन-अडीचला, आम्ही दारासुरमला (दरशुराम, Darasuram) निघालो. दारासुरम कुंभकोणम पासून  चार, पाच किलोमीटरवर वसलेले गाव. येथील चोला राजांनी बांधलेले ऐरावतेश्वर हे मंदिर प्रसिद्ध. चोला राजाची सध्या तीन मंदिरे उपलब्ध आहे. त्यातील दोन मंदिरे आम्ही या प्रवासात पाहणार होतो. त्यापैकी हे पहिलं. रंगनाथस्वामीच्या मंदिराला मी चोला राजाचे मंदिर मानत नाही. ते मंदिर चोला राजांनी बांधायला सुरुवात केली पण पुढे अनेक वेगवेगळ्या राजवटींनी त्यावर आपला ठसा उमठवला आहे.
पण ऐरावतेश्वर हे चोलाराजाचेच मंदिर आहे.
 चोला राजाच्या मंदिर बांधण्याची काही  वैशिष्ट्ये आहेत. त्यामध्ये
१. गोपूराची उंची कळसापेक्षा लहान
२. कळसावर केलेले सुंदर नक्षीकाम
३. देवाचे वाहन देवापासून बऱ्याच अंतरावर 
४. उपदेवासाठी स्वतंत्र मंदिर
सदर वैशिष्ठे पाठ करा, परीक्षेला प्रश्न येणार आहे.  ही सर्व वैशिष्ट्ये याही मंदिरात दिसून येतात.

पौराणिक माहिती
ऐरावत हा इंद्राचा पांढरा हत्ती. दुर्वास मुनींच्या शापामुळे तो काळा पडला. शंकरांच्या सांगण्यावरून हत्तीने जवळच असलेल्या तळ्यावर स्नान केले व तो पूर्वीसारखा पांढरा झाला म्हणूनच या शंकराला ऐरावतेश्वर असे म्हटले जाते. तसेच यमाच्या ही अंगाचा दाह होऊ लागला. त्याने शंकराची प्रार्थना केली व शंकरांनी त्याला येथील याच तळ्यात स्नान करण्यास सांगितले व तसे केल्यावर त्याचा दाह कमी झाला. बायको/नव-यांच्या दाहापासून मुक्ती मिळण्यासाठी कुठे स्नान करावे? असा प्रश्न सुज्ञ वाचकांसारखा मलापण पडला होता.

ऐतिहासिक माहिती
मंदिराचे बांधकाम  चोला राजा “राजाराजा” दोन याच्या काळात झाले असावे. चोला मंदिराच्या पद्धतीनुसार नंदी मंदिरापासून बराच दूर आहे.  नंदीच्या मागे सात पायऱ्या आहेत. या पायऱ्यांना संगीत पायऱ्या असे म्हटले जाते. पायऱ्यांवर विशिष्ट पद्धतीने दगडाचा आघात केलास, ‘सा,रे,ग,म,प,ध,नि,सा’ असा आवाज उत्पन्न होतो. सदर पायऱ्यांना संरक्षक जाळी  ( मराठीत कंपाउंड)असल्यामुळे यातून येणारा आवाज ऐकू शकलो नाही.


 मंदिरात प्रवेश केल्या केल्या भिंतीवर दोन मूर्ती आहेत. या द्वारपाल असण्याचा अनेक लोकांचा गैरसमज होऊ शकतो. पण त्या आहेत स्कंद व पद्म निधी. या दोन्हीही समुद्र व गोड्या पाण्याचा जलाशय यांचे रक्षण करणा-या देवता आहेत. चोला राजासाठी पाणी हे अत्यंत महत्वाचे होते. चोला राजाचे राज्य अनेक देशांत होते. जसे की इंडोनेशिया, जावा, सुमात्रा.  त्यामुळे  स्कंद व पद्म निधीला महत्वाचे स्थान आहे.  त्यावेळी समुद्र ओलांडून जायला बंदीपण नव्हती.


त्याच्यापुढे ‘अर्धनारीनटेश्वराची’ मूर्ती आहे.
सभामंडप रथाच्या आकाराप्रमाणे बनवला असून घोडे ओढत आहे अशी उपमा कलाकारांनी दगडातून दाखवली आहे.
हे घोडे व रथांची चाके सहा वेगवेगळ्या दगडांपासून बनवलेली आहेत. सर्वसाधारणपणे एकाच दगडातून बनवायची पद्धत त्याकाळी रुढ होती. आणि अशाच पद्धतीची मूर्ती कोणार्क मध्येही आहे.


आतील खांबांवर वेगवेगळ्या प्रसंगांची चित्रे आहे जसं की मदन दहन  किंवा शिवाचे लग्न, गणपतीचे लग्न. मंदिराच्या पाठीमागे लिंगोद्भव  देवाची मूर्ती आहे. यांची कथा पण फारच सुंदर आहे. पण ती पुन्हा कधीतरी.

दृष्टिभ्रम करणाऱ्या अनेक मूर्ती या मंदिरात आहेत जसे की हत्ती आणि बैल (बदामीला ही हेच शिल्प आहे), एकच डोके, दोन हात व  सहा पाय असलेली मूर्ती, मृदुंग वाजवणारे तीन लोक पण पाय मात्र चार या व अशा अनेक दृष्टीभ्रम करणाऱ्या मूर्ती मंदिरात आहेत. 
हत्तीच्या धडावर हात ठेवून फोटो बघा व नंतर बैलाच्या धडावर हात ठेवून बघा





कैलास पर्वत हलवणा-या रावणाचीही मूर्ती या मंदिरात आहे. पण वेरूळच्या येथील असलेली गुणवत्ता व सुबकता या मूर्तीमध्ये दिसत नाही.
ऐरावतेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही कुंभकोणम बघण्यासाठी कुंभकोणम मध्ये परत आलो. येथे अनेक मंदिरे आहेत. हे मंदिरांचे शहर म्हणूनच ओळखले जाते.  येथे शंकरांची १२  मंदिरे आहेत. विष्षूची ५ मंदिरे आहेत.
या सर्वात महत्त्वाचे मंदिर म्हणजे  ‘आदी  कुंभेश्वर’. प्रलय होण्याच्या आधी ब्रह्मदेवाने वेगवेगळ्या जातीचे प्राणी एका कुंभात भरून ठेवले होते व त्याच बरोबर अमृतही ठेवले होते.  हा कुंभ त्यांनी कैलास पर्वतावर ठेवला होता. प्रलयामुळे तो कुंभ कैलास पर्वतावरून खाली आला आणि तो तसाच समुद्राला जातो की काय असे सर्व देवांना वाटले. शंकराने भिल्लाच्या रूपात या  कुंभांचा कोन फोडून जीवसृष्टी परत एकदा निर्माण केली.  तेच हे ठिकाण -कुंभकोणम.  या ठिकाणी असलेले शंकराचे लिंग हे शंकरांनी स्वतः स्थापन केलेले आहे. त्यामुळे त्याला विषेश महत्व आहे. मंदिरात पोहोचेपर्यंत ६ वाजले होते. यावेळेस आम्हाला येथील आरती बघायला मिळाली.  ही आरती अतिशय नयनरम्य होती. त्यानंतर शेजारील मंत्राबिंका (मंगला अंबिका?) ची पण आरती झाली. हे मंदिर साधारण ७व्या शतकांतील असावे. हे जरी चोला राजांनी बांधलेले असले तरी यांची देखरेख मदुराईच्या नायकांनी केली होती.
तेथूनच जवळ असण्या-या  ‘शारंगपाणी’या विष्णूच्या मंदिरात गेलो. मंदिर अतिशय छान आहे. परत खोलीवर आलो.

दुस-या दिवशी पाहिलेले, नटराज (चिंदबरम) व तरंगबडी हे नंतरच्या भागात…

Thursday, November 22, 2018

तामिळनाडू २०१८ -भाग -२

रंगनाथस्वामीमंदिराची माहिती जरा सविस्तर देत आहे.

पौराणिक माहिती
श्रीरामांच्या राज्याभिषेकाला बिभीषणापण आले होते. त्यांना आपल्या जवळची विष्णूची मूर्ती रामाने देऊ केली. ती मूर्ती घेऊन ते श्रीलंकेकडे निघाले असताना, श्रीरंगम् येथे थांबले. काही कारणाने ही मूर्ती इथेच थांबली. त्या मूर्तीला कुणालाही उचलता येईल. बिभीषणांना विष्णूने दृष्टांत दिला, मी कायमच तुझ्या राजधानीकडे म्हणजे दक्षिणेकडे पाहत राहीन, मला कावेरीच्या काठावर राहू दे. त्यामुळे मंदिर दक्षिणाभिमुख आहे.

वैष्णव संप्रदायात विष्णूच्या १०८ मंदिरांना अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यापैकी १०५ मंदिरे भारतात आहेत. एक मंदिर नेपाळमध्ये असून, राहिलेली दोन मंदिरे ही पृथ्वीच्या बाहेर आहेत असे मानले जाते. त्यापैकी एकाला क्षीरसागर म्हणजे दुधाचा सागर दुसरे परमपदम म्हणजेच वैकुंठ असे म्हणतात. या सर्व मंदिरांमध्ये जे मंदिर 'आदी' मंदिर म्हणजेच मुख्य मंदिर आहे, ते म्हणजे हे  रंगनाथस्वामी मंदिर. त्यामुळे या मंदिराला वैष्णवांच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेले विश्वकसेनाचे स्वतंत्र मंदिर. विश्वकसेना हा विष्णूचा मुख्य सेनापती आहे. मुख्य उत्सवाच्या एक दिवस आधी विश्वकसेना पूर्ण गावात फिरतातवाटेत असणाऱ्या सर्व दुष्ट वाईट शक्तींचा नाश करतात मुख्यमुर्तीसाठी रस्त्या सुरक्षित  होतो, असा येथील लोकांचा समज आहे. आणि उत्सवाच्या दिवशी हा विश्वकसेना संपूर्ण जगावर विष्णूच्या नावाने राज्य करतो. विश्वकसेनासाठी (उपदेवता) स्वतंत्र मंदिर हे चोला राजाच्या मंदिर बांधण्यातील एक वैशिष्टय आहे.

ऐतिहासिक माहिती
चोला राजाराजाराजा दोन (११४६- ११७३) ला दृष्टांत झाला व त्याप्रमाणे त्याने ह्या जागेवर खणून पाहता त्याला विष्णूची मूर्ती सापडली. त्याने येथे विष्णूचे मंदिर बांधले. साधारण हा  आकराशे ते बाराशेच्या आसपासचा काळ असावा. या नंतरच्या काळात मदुराईचा नायक, सुंदर पांड्या यांने या मंदिरासाठी 'गजकतुलावारा' केली. 'गजकतुलावारा' याचा अर्थ आपले व एक हत्तीच्या वजनाइतके सोन्या-चांदीचे दान मंदिरासाठी करायचे. त्यासाठी त्याने दोन नावांचा(boats) वापर केला. ती गोष्ट मोठी मनोरंजक व वैज्ञानिक आहे. गजकतुलावारा केल्यामुळे सुंदर पांड्याला हेमचंद्रा असेही म्हणू लागले. हेमचंद्रा याचा अर्थ मंदिरावर सोन चढवणारा. नंतरच्या काळात येथे अनेक मुसलमान राजांनी आक्रमण केली. त्यामधील एक दिल्लीचा सुलतान मलिक काफुर(?-१३१६). याने या देवळावर आक्रमण करुन येथील खजिना व त्याचबरोबर विष्णूची मूर्तीही पळवून नेली. ही मूर्ती त्याची मुलगी सुलतानी खेळण्यातील बाहुलीप्रमाणे वापरायची. या बाहुलीसाठी तिने कपडेही शिवून घेतले होते. ती बाहुली सतत तिच्या जवळ असायची. येथील लोकांनी राजाची मर्जी सांभाळून (नृत्य,कला दाखवून) त्याच्याकडून ती मूर्ती परत मागून घेतली. ही मूर्ती घेऊन ते श्रीरंगमला परत येत होतो. आपल्याकडील मूर्ती नाही हे सुलतानीला समजल्यावर ती तडकश्रीरंगम्ला आली. पण तोपर्यंत  मूर्ती तेथे आली नव्हती. हे पाहून तिने मंदिरातच आपले प्राण अर्पण केलेमुख्य पुजाऱ्याच्या स्वप्नात जाऊन विष्णूने सांगितले की ती पण माझी भक्त आहे आणि तिचा योग्य तो सन्मान केला जावा. त्यावेळेस पासून तिच्यासाठी मंदिराच्या आवारातच एक भिंत तयार करण्यात आली आजसुद्धा विष्णूला दाल (दाळ), रोटीचा प्रसाद दाखवला जातो. तसेच सकाळच्या वेळेस विष्णूला रंगीत लुंगीही नेसवली जाते. (या कथेबद्दल अनेक मते कथा आहेत). यानंतर विजयनगरच्या राजाने या मंदिराला विशेष अर्थसाहाय्य करून मंदिराचा फार मोठ्या प्रमाणात कायाकल्प केला. मंदिरातील शेवटच्या गोपूराचे बांधकाम अगदी अलीकडे म्हणजे १९८७ पर्यंत होत होते.

मंदिराची माहिती
आधी सांगितल्याप्रमाणे हे जगातील (पूजा केले जाणारे) सर्वात मोठे मंदिर आहे. मंदिर १५६ एकरावर पसरलेले आहे. साधारण १० किक्रेटच्या मैदाना इतके. या मंदिराला २१ गोपूर आहेत. त्यातील एक गोपूर २३७ फूट उंचीचे आहे




चोला नंतरच्या काळात  मंदिरांच्या गोपूरांची उंची ही मंदिराच्या कळसापेक्षा जास्त ठेवण्याची प्रथा रुढ झाली. सदर मंदिराचा विस्तार नंतरच्याच काळात जास्त झाला असल्याने, गोपूराची उंची जास्त आहे. दक्षिणेकडे मंदिराच्या कळसाला विमान असे म्हटले जाते. या कळसाला नाव देण्याचीही पद्धत आहे. जसं तिरुपतीच्या कळसाला आनंदनिलया किंवा कांचीपुरमच्या कळसाला पुण्याकोटी म्हणतात. तर या मंदिराच्या कळसाला प्रणवकार असे म्हणतात.
मघाशी सांगितल्याप्रमाणे विष्णूची महत्त्वाची १०८ मंदिरे आहेतत्यातील एक म्हणजे परमपदम(वैकुंठ).  या वैकुंठाला जाण्याचा एक मार्ग या मंदिरातून आहे.
मंदिराच्या मागच्या बाजूला एक सजवलेला  दरवाजा   त्या दरवाज्यावर असलेल्या दोन पाली आणि दारासमोर जमिनीवर केलेली पाच बीळे. या पाच बीळांत पाच बोटे घालून, पालीकडं बघत देवाला वैकुंठाचे दार उघडण्याची विनंती करणारे भाविक आज पण तुम्ही पाहू शकता. वैकुंठ एकादशीला या दरवाजातून जो जातो तो वैकुंठाला पोहोचतो अशी मान्यता आहे.

  पाच बीळे पाली या प्रतीकं असावीत. जो व्यक्ती आपल्या पंचेंद्रियांना काबूत करतो देवाच्या पायापाशी पालीप्रमाणे घट्ट धरुन बसतो. तो जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका करुन वैकुंठाला पोहचतो.
  मंदिराबद्दल अजूनही खूप माहिती आहे. जसे की रामानुजन, धन्वंतरी, सहस्त्र खांभाचे मंदिर , हग्रीव. पण ती माहिती लिहल्यास वाचकांना कंटाळा येईल. म्हणून ती माहिती देत नाही. कुणी हे मंदिर बघण्यासाठी जाणार असेल किंवा ही माहिती पाहिजे असल्यास मला सांगा.

मंदिर बघण्यात जवळजवळ दोन, तीन तास वेळ गेला. मंदिरापासून चेटराम (Chatram) बसस्थानकावर गेलो. तेथुन कालानाई (Kallanai) धरण बघण्यासाठी गेलो. या धरणाचे वैशिष्ट म्हणजे, हे चोला राजा करीकलन यांनी इसवीसन २०० व्या शतकात बांधले होते. म्हणजे आजपासून जवळजवळ आठशे वर्षांपूर्वी. धरणाची लांबी १००० फूट असून  उंची ६५ फूट होती. या धरणामुळे आजूबाजूच्या ७०००० एकर जमिनीला पाण्याचा पुरवठा मिळाल होता


    

















चोला राजे हे  शेतीला प्रोत्साहन देणारे होते. इंग्रजांच्या काळात याच मॉडेलचा वापर करून या धरणाची उंची दोन फूटाने वाढवण्यात आली. पूर्वीची उंची ६५ फूट होती ती आता ६७फूट आहे. या धरणाजवळ आजही तुम्ही सर अर्थर कॉटन यांचा पुतळा बघू शकता. राजा करीकलन अश्वारुढपुतळा बागेत बसवला आहे. पण हे धरण राजा करीकलन यांनी बांधले होते, असा नामोल्लेख पण कुठे नव्हता. कित्येक स्थानिक पर्यटकांचा समज असा होता की हे धरण  सर अर्थर कॉटन यांनी बांधलं. मला वाटतं हीच आपली शोकांतिका आहे. असो.






















हे धरण बघून आम्ही परत चेटराम बसस्थानकावर आलो. येथून  जवळच 'रॉक फोर्ट' (दगडावरील) गणपतीचे मंदिर आहे. मंदिरात जाण्यासाठी ३५०-४०० पायर्‍या आहेत


मंदिराच्या वर गेलं की पूर्ण तिरची आणि श्रीरंगम् शहराचे विहंगम दृश्य दिसतं



या मंदिराच्या गणपतीची आख्यायिका गोकर्ण महाबळेश्वरशी साधर्म्य सांगणारी आहे
श्रीरंगस्वामी यांची मूर्ती, ज्यावेळेस विभीषण श्रीलंकेत घेऊन चालले होते. त्यावेळेस ते संध्याकाळी स्नानसंध्या करण्यासाठी कावेरीच्या काठावर थांबले. जवळच असलेल्या गुराख्याच्या रूपातील गणपतीला विष्णूची मूर्ती दिली विभीषण स्नानसंध्या करु लागले. गणपतीने याचा फायदा घेऊन मूर्ती खाली ठेवली. आपली मूर्तीची चुकीच्या ठिकाणी स्थापन झालेली पाहून बिभीषण चिडले त्या गुराख्याच्या मागे धावून लागले. गुराखी येथे जवळच असलेल्या या दगडावर जाऊन बसला. बिभीषण त्याच्यामागे पळत जाऊन त्यानी त्या गुराख्याच्या डोक्यात एक बुक्की मारलीत्यावेळेस गुराखी आपल्या मूळ स्वरूपात म्हणजेच गणपतीच्या स्वरूपात येऊन दर्शन दिले. बिभीषणांनी गणपतीची माफी मागितली. गणपतीने श्रीरंग स्वामींचे मंदिर कावेरी तटावरच असावे असे बिभीषणाला सांगितले. मंदिरात गणपतीचे दर्शन घेऊन आम्ही परत खोलीवर आलो.

तंजावर जवळच होते, पण मला तंजावरला दोन दिवस लागतील असे वाटले. म्हणून आधी कुंभकोणम बघण्यासाठी ११ नोव्हेंबरला निघालो. कुंभकोणमबद्द्ल पुढील लेखात.