Friday, December 14, 2018

सवाई २०१८- दिवस ३


पं. उल्हास कशाळकर

संख्याशास्त्रात कुठलाही निर्णय घेतल्यावर दोन प्रकारच्या चुका होतात हे मान्य केलेलं आहे. कलाकारांच्या बाबतीत बोलायचं तर त्या चुका खालील प्रकारे असू शकतात.
 १. चांगल्या कलाकारांची कला न ऐकणे
 २. वाईट कलाकारांची कला ऐकणे
ज्या वेळेस आपल्याला कलाकारांबद्दल माहीत असत त्यावेळी दुसरी चुक होतच नाही. वेळ नसणे/दुसरं काम यामुळे पहिली चुक होऊ शकते.
ज्या वेळेस आपल्याला कलाकारांबद्दल माहीत नसतं त्यावेळी दोन्ही चुका होऊ शकतात. वयाच्या पोक्तपणा मुळे म्हणा किंवा गेले ३-४ वर्षातील सवाईच्या अनुभवाने म्हणा, मी सवाईत "अशा" अपरिचित कलाकारांना टाळतो. त्यामुळे 'वाईट कलाकारांची कला ऐकणे' ही चुक होतंच नाही. कधी कधी छान कलाकार हातातून निसटतो. नशीब आपलं.
पं. उल्हास कशाळकरांच्याबाबती म्हणायचं झालं तर पहिल्या प्रकाराचीच चुक होऊ शकते. ती म्हणजे 'चांगल्या कलाकारांची कला न ऐकणे'
काल ती चुक काही झाली नाही. बरोबर योग्य वेळी सवाईच्या मंडपात आलो. तंबोरा व तबला लावताना ऐकणे हे पण त्या गाण ऐकण्या इतकंच महत्त्वाचं असतं. नेहमीप्रमाणे तबल्याला तालयोगी पं. सुरेश तळवळकर. या दोन कलाकाराचं मिश्रण अजबच आहे.
कशाळकरांनी बसंतबहार रागाने सुरुवात केली. एकतर त्या रागाची स्वःताची एक नजाकत आहे. एकमेकांत अडकत जाणारे स्वर साखळीसारखे रसिकांना दाखवता आले तरच तो राग पूर्णपणे दाखवता आला असं मला वाटतं. कशाळकरांनी सुरवातीलाच ती अपेक्षा पूर्ण होणार यांचे संकेत दिले. रागाची सौंदर्यस्थळ दाखवण्यात त्यांची हातोटी आहेच. एकमेकांत अडकत जाणार स्वर म्हणजे एखाद्या रुपवतीने चालताना माग वळून बघावं असं वाटतं होतं. तशाच प्रकारचा अनुभव कशाळकरांनी जागोजागी दिला.
कशाळकरांनी दाखवलेला 'म' त्यांच्या विचाराच्या गहरेपणाची खोली  दाखवत होता. नेहमीप्रमाणे बहारदार ताना या रागाची मजा आणखीन वाढवत होत्या.
तालयोगींची साथ म्हणजे गायकाला व गाण्याला धरुन स्वःताचे वैशिष्टय दाखवणारी. आजकाल साथीचे तबलेवाले स्वःताला एकल तबला वादनासाठी बोलावले आहे अशा थाटात वाजवत असतात. त्यावेळी तालयोगींची साथ ही खर्‍या अर्थाने साथ म्हणून समर्पक वाटते.
त्यानंतर त्यांनी खमाज रागात एक बंदिश सादर केली. एक रसिक म्हणुन मला खमाज हा बसतंबहराच्या पुढे फिक्का वाटला.
एखाद्या वेळेस बंद सभागृहात बसतंबहार नंतर खमाज बराही वाटेल. पण सवाईमध्ये तो राग मात्र थोडा फिक्का वाटला. कशाळकरांनसारख्या ज्येष्ठ व श्रेष्ठ गायकाने हे राग का निवडले, त्यामागे काही तरी विशेष विचार असणारच. असो.
जन्माने पुणेकर असल्यामुळे, सवाईमध्ये शेवटच्या भजनांच्या दोन ओळी झाल्यावर उठून चालत भजन ऐकणे हे आम्ही आमचं कर्तव्य मानतो. पण कशाळकरांनी 'या झोपडीत माझ्या' हे तुकडोजी महाराजाचं भजन सुरु केलं आणि उठून चालायचे विसरूनच गेलो. पूर्ण भजन एका जागेवर बसुन ऐकलं.
एका कार्यक्रमात पूर्ण प्रवेशिकेचे पैसे वसूल.




Thursday, December 6, 2018

तामिळनाडू २०१८ -भाग - ६

१५ तारखेला तंजावर सोडले. तिरची, नमक्कल मार्गे सालेमला (उच्चार सेला) पोहचलो. हे अंतर बरच म्हणजे २१२ कि.मी होतं. सात ते बारा अशा पाच तासात पोहचलो. येरकड हे गाव सालेमपासून ३०-३५ किमी अंतरावर आहे. मी पश्चिम घाटातील अनेक थंड हवेची ठिकाणे पाहिली आहेत, पण हे पूर्व(?)घाटातील थंड हवेचे ठिकाण.
बेंगळुरूपासून जवळ असल्याने तेथील लोकांच्यात हे प्रसिद्ध आहे. पण महाराष्ट्रातील अनेकांना या थंड हवेच्या ठिकाणाबद्दल माहिती नसेल.  फारसे प्रसिद्ध नसलेले पण निसर्ग सौंदर्याने भरलेले असे हे ठिकाण.
गावाच्या मधोमध एक तळ, तामिळनाडू पर्यटन विभागाने छान बोटीची सोय ठेवली आहे. हाॅटेलवर सामान टाकून लगेच तळ्यावर गेलो. छानपैकी नौकाविहार (बोंटीग) केल्यावर जवळच असणारे उद्यान बघितले.

छोटेखानी पण उत्तम व्यवस्थापन असणारे उद्यान. समोरच असण्यार्‍या मत्स्यगृहात गेलो. अतिशय वाईट. बिलकूल जाऊ नये असं वर्णन या मत्स्यगृहाचं करता येईल. येथे अनेक प्रेक्षणीय स्थळे (म्हणजे Points बरं का!!!) आहेत. असल्या(?) स्थळांच्या मागे लागणारा मी नाही. अशा गावात नुसतं भटकत राहीलं तरी एक वेगळे समाधान मिळतं. असेच भटकत आम्ही दोन, चार स्थळं पाहिली.
दुसर्‍या दिवशी सकाळी खोलीच्या सज्जात (बाल्कनीत) ढग. अप्रतिम. मस्तपैकी काॅफी पीत ढग बघत बसणे हा एक छान अनुभव होता.

नाष्टा करुन परत एकदा गावाचा फेरफटका मारला.  “एक चित्र शंभर वाक्यांच्या इतकं असतं” असे म्हणतात, म्हणून पांढ-यावर काळं करण्यापेक्षा पांढ-यावर रंगीत करणारी जास्त छायाचित्र टाकत आहे.












संध्याकाळी सालेमला जायला निघालो व रात्री तिथून पुण्याला यायला निघालो दुसर्‍यां दिवशी पुण्याला पोहचलो.

समारोप

एकंदर ४००० कि.मी. हा प्रवास साधारण १५ दिवसात पूर्ण केला. या सहलीसाठी तिरुपती, पोंडीचेरी, चिदंबरम, तरंगबडी, कुंभकोणम, तंजावर व येरकड हा जास्त चांगला मार्ग आहे.
आमच्या सहलीची सुरवात श्री अरविदो आश्रमांनी केली. मन प्रसन्न व शांत करणारे ठिकाण. तिरुपती म्हणजे हुकुमाचा एक्का. कधीही जावा. तिरची येथील रंगनाथस्वामीचे वैष्णव मंदिर बघितले. जिथे रुढी हजारो वर्षांपासून चालू आहेत. पण स्वामींना रंगीत लुंगी नेसवून ‘बदल’ अनिवार्य आहे हे पण बघितले. कुंभकोणम मधील ऐरावतेश्वर म्हणजे दागिन्यावर केलेली बारीक कलाकुसर. दृष्टिभ्रम करणारी लेणी. वा क्या बात है! पण हे करणारा ही शेवटी कलाकार. प्रत्येक वेळेस उच्चाप्रतीची कला कशी निर्माण होईल? हेच येथील कैलास लेण्याने दाखवले.
तरंगबडीचा किल्ला व समुद्र तसाच पिचावरच्या समुद्रतटिय वनस्पती बघुन आपण निर्सगापुढे किती क्षुद्र आहोत हे दिसतं. नटराजाच्या देवळात भेटणारा वैष्णव 'श्रीनिवास' हा पण आताच्या जगात आहे. याच भान होतं. तंजावरच बहृदेश्वर म्हणजे मागं म्हटल्याप्रमाणे कळस. अशा राजाच्या, स्थापत्यशास्त्रज्ञांच्या समोर आपण किती खुजे आहोत यांचा पुन्हा प्रत्यय येतो. येरकडचं निसर्ग सौंदर्य नक्कीच पहाण्यासारखे आहे. हे सगळे पाहून परत महाराष्ट्रांत यावस वाटतं हे महाराष्ट्रांच “सौंदर्य” आहे.
हा सर्व प्रवास रेल्वे आणि राज्य परिवहन मंडळाच्या बसने केला. भाषेची समस्या सोडून देता येथील माणसांनी खुप मदत केली. गुगल तर रोड सांगेलच पण अनोळखी माणसाला पत्ता विचारण्याची मज्जा काही औरच. असे अनेक प्रसंग या सहलीत आले.
जीवनाचा प्रवास तर असाच चालू राहील. या प्रवासात परत कधी प्रवास केला तर तो प्रवास घेऊन नक्कीच तुमच्या भेटीला परत येईन.

इति लेखनसीमा