Thursday, December 6, 2018

तामिळनाडू २०१८ -भाग - ६

१५ तारखेला तंजावर सोडले. तिरची, नमक्कल मार्गे सालेमला (उच्चार सेला) पोहचलो. हे अंतर बरच म्हणजे २१२ कि.मी होतं. सात ते बारा अशा पाच तासात पोहचलो. येरकड हे गाव सालेमपासून ३०-३५ किमी अंतरावर आहे. मी पश्चिम घाटातील अनेक थंड हवेची ठिकाणे पाहिली आहेत, पण हे पूर्व(?)घाटातील थंड हवेचे ठिकाण.
बेंगळुरूपासून जवळ असल्याने तेथील लोकांच्यात हे प्रसिद्ध आहे. पण महाराष्ट्रातील अनेकांना या थंड हवेच्या ठिकाणाबद्दल माहिती नसेल.  फारसे प्रसिद्ध नसलेले पण निसर्ग सौंदर्याने भरलेले असे हे ठिकाण.
गावाच्या मधोमध एक तळ, तामिळनाडू पर्यटन विभागाने छान बोटीची सोय ठेवली आहे. हाॅटेलवर सामान टाकून लगेच तळ्यावर गेलो. छानपैकी नौकाविहार (बोंटीग) केल्यावर जवळच असणारे उद्यान बघितले.

छोटेखानी पण उत्तम व्यवस्थापन असणारे उद्यान. समोरच असण्यार्‍या मत्स्यगृहात गेलो. अतिशय वाईट. बिलकूल जाऊ नये असं वर्णन या मत्स्यगृहाचं करता येईल. येथे अनेक प्रेक्षणीय स्थळे (म्हणजे Points बरं का!!!) आहेत. असल्या(?) स्थळांच्या मागे लागणारा मी नाही. अशा गावात नुसतं भटकत राहीलं तरी एक वेगळे समाधान मिळतं. असेच भटकत आम्ही दोन, चार स्थळं पाहिली.
दुसर्‍या दिवशी सकाळी खोलीच्या सज्जात (बाल्कनीत) ढग. अप्रतिम. मस्तपैकी काॅफी पीत ढग बघत बसणे हा एक छान अनुभव होता.

नाष्टा करुन परत एकदा गावाचा फेरफटका मारला.  “एक चित्र शंभर वाक्यांच्या इतकं असतं” असे म्हणतात, म्हणून पांढ-यावर काळं करण्यापेक्षा पांढ-यावर रंगीत करणारी जास्त छायाचित्र टाकत आहे.












संध्याकाळी सालेमला जायला निघालो व रात्री तिथून पुण्याला यायला निघालो दुसर्‍यां दिवशी पुण्याला पोहचलो.

समारोप

एकंदर ४००० कि.मी. हा प्रवास साधारण १५ दिवसात पूर्ण केला. या सहलीसाठी तिरुपती, पोंडीचेरी, चिदंबरम, तरंगबडी, कुंभकोणम, तंजावर व येरकड हा जास्त चांगला मार्ग आहे.
आमच्या सहलीची सुरवात श्री अरविदो आश्रमांनी केली. मन प्रसन्न व शांत करणारे ठिकाण. तिरुपती म्हणजे हुकुमाचा एक्का. कधीही जावा. तिरची येथील रंगनाथस्वामीचे वैष्णव मंदिर बघितले. जिथे रुढी हजारो वर्षांपासून चालू आहेत. पण स्वामींना रंगीत लुंगी नेसवून ‘बदल’ अनिवार्य आहे हे पण बघितले. कुंभकोणम मधील ऐरावतेश्वर म्हणजे दागिन्यावर केलेली बारीक कलाकुसर. दृष्टिभ्रम करणारी लेणी. वा क्या बात है! पण हे करणारा ही शेवटी कलाकार. प्रत्येक वेळेस उच्चाप्रतीची कला कशी निर्माण होईल? हेच येथील कैलास लेण्याने दाखवले.
तरंगबडीचा किल्ला व समुद्र तसाच पिचावरच्या समुद्रतटिय वनस्पती बघुन आपण निर्सगापुढे किती क्षुद्र आहोत हे दिसतं. नटराजाच्या देवळात भेटणारा वैष्णव 'श्रीनिवास' हा पण आताच्या जगात आहे. याच भान होतं. तंजावरच बहृदेश्वर म्हणजे मागं म्हटल्याप्रमाणे कळस. अशा राजाच्या, स्थापत्यशास्त्रज्ञांच्या समोर आपण किती खुजे आहोत यांचा पुन्हा प्रत्यय येतो. येरकडचं निसर्ग सौंदर्य नक्कीच पहाण्यासारखे आहे. हे सगळे पाहून परत महाराष्ट्रांत यावस वाटतं हे महाराष्ट्रांच “सौंदर्य” आहे.
हा सर्व प्रवास रेल्वे आणि राज्य परिवहन मंडळाच्या बसने केला. भाषेची समस्या सोडून देता येथील माणसांनी खुप मदत केली. गुगल तर रोड सांगेलच पण अनोळखी माणसाला पत्ता विचारण्याची मज्जा काही औरच. असे अनेक प्रसंग या सहलीत आले.
जीवनाचा प्रवास तर असाच चालू राहील. या प्रवासात परत कधी प्रवास केला तर तो प्रवास घेऊन नक्कीच तुमच्या भेटीला परत येईन.

इति लेखनसीमा




No comments:

Post a Comment