Thursday, July 12, 2018

अभंगाची दिंडी - दिवस ८

संत  ज्ञानेश्वर माऊली
माऊलींसारखा संन्यास्थ योगी शृंगार आपल्या साहित्यातून कसे प्रगट करू शकतो हे पाहण्यासाठी त्यांच्या विरहणी जरूर वाचाव्यात.
मी अंगणात उभी राहले असताना येणारा जाणार विचारू लागला "विठ्ठल?" आजूबाजूच्या सर्वच गोष्टी "विठ्ठल विठ्ठल" म्हणू लागल्या. तहान भूक तर सोडूनच द्या पण लाज व अभिमानपण राहिला नाही इतकी मला कृष्णाची ओढ लागली. माझा सखा (जिवींचा जिवनु) पांडुरंगच स्वःता येऊन माझं मनोरथ पूर्ण करेल.

पैल निळाचिये वेळीं । आंगणी उभी ठेलिये ।
येतिया जातिया पुसे । विठ्ठल केउता गे माये ॥१॥
पायरऊ जाला संचारु नवल ।
वेधें विंदान लाविलें म्हणे विठ्ठल विठ्ठल ॥२॥
नेणें तहान भूक । नाहीं लाज अभिमान ।
वेधिलें जनार्दनी । देवकीनंदना लागोनी गे माये ॥३॥
बापरखुमादेविवरु | जिवींचा जिवनु ।
माझे मनिंचे मनोरथ | पुरवीं कमळनयनु गे माये ॥४॥

केउता: कसा; कशी
वेधें  चित्ताकर्षकपणा
विंदान : कौशल्य; चातुर्य; कारागिरी; लाघव
वेधिलें: आकर्षिणे


साडीच्या दुकानात प्रत्येक मजल्यावर सुंदर साड्या अशा अनेक मजल्यांच्या दुकानातून एकच साडी घेताना जितका त्रास होतो तितकाच त्रास माऊलींचा एकच अभंग निवडताना होतो. (विरहणी वाचल्यामुळे साडीची उपमा सुचली.) म्हणून काही संताचे एकापेक्षा जास्त अभंग दिंडीत येणार आहेत.

No comments:

Post a Comment