Saturday, November 24, 2018

तामिळनाडू २०१८ -भाग - ३

प्रलयानंतर प्रथम जीवसृष्टी निर्माण झालेलं शहर म्हणजे कुंभकोणम.

११ नोव्हेंबरला सकाळी आम्ही श्रीरंगम् सोडले व कुंभकोणमला दुपारी बारा वाजता पोहचलो. जेवण करून मंदिर बघण्यासाठी तयार झालो. तोपर्यंत तेथील लोकांनी सांगितले की तमिळनाडूतील सर्व मंदिरे ही एक ते चार बंद असतात. पुण्यातील एक  दुकान दुपारी बंद असते तर काय विनोद होतात! येथे तर मंदिरे बंद असतात म्हणजे किती विनोद तामिळभाषेत होत  असतील?
 दुपारची थोडी विश्रांती घेऊन साधारण दोन-अडीचला, आम्ही दारासुरमला (दरशुराम, Darasuram) निघालो. दारासुरम कुंभकोणम पासून  चार, पाच किलोमीटरवर वसलेले गाव. येथील चोला राजांनी बांधलेले ऐरावतेश्वर हे मंदिर प्रसिद्ध. चोला राजाची सध्या तीन मंदिरे उपलब्ध आहे. त्यातील दोन मंदिरे आम्ही या प्रवासात पाहणार होतो. त्यापैकी हे पहिलं. रंगनाथस्वामीच्या मंदिराला मी चोला राजाचे मंदिर मानत नाही. ते मंदिर चोला राजांनी बांधायला सुरुवात केली पण पुढे अनेक वेगवेगळ्या राजवटींनी त्यावर आपला ठसा उमठवला आहे.
पण ऐरावतेश्वर हे चोलाराजाचेच मंदिर आहे.
 चोला राजाच्या मंदिर बांधण्याची काही  वैशिष्ट्ये आहेत. त्यामध्ये
१. गोपूराची उंची कळसापेक्षा लहान
२. कळसावर केलेले सुंदर नक्षीकाम
३. देवाचे वाहन देवापासून बऱ्याच अंतरावर 
४. उपदेवासाठी स्वतंत्र मंदिर
सदर वैशिष्ठे पाठ करा, परीक्षेला प्रश्न येणार आहे.  ही सर्व वैशिष्ट्ये याही मंदिरात दिसून येतात.

पौराणिक माहिती
ऐरावत हा इंद्राचा पांढरा हत्ती. दुर्वास मुनींच्या शापामुळे तो काळा पडला. शंकरांच्या सांगण्यावरून हत्तीने जवळच असलेल्या तळ्यावर स्नान केले व तो पूर्वीसारखा पांढरा झाला म्हणूनच या शंकराला ऐरावतेश्वर असे म्हटले जाते. तसेच यमाच्या ही अंगाचा दाह होऊ लागला. त्याने शंकराची प्रार्थना केली व शंकरांनी त्याला येथील याच तळ्यात स्नान करण्यास सांगितले व तसे केल्यावर त्याचा दाह कमी झाला. बायको/नव-यांच्या दाहापासून मुक्ती मिळण्यासाठी कुठे स्नान करावे? असा प्रश्न सुज्ञ वाचकांसारखा मलापण पडला होता.

ऐतिहासिक माहिती
मंदिराचे बांधकाम  चोला राजा “राजाराजा” दोन याच्या काळात झाले असावे. चोला मंदिराच्या पद्धतीनुसार नंदी मंदिरापासून बराच दूर आहे.  नंदीच्या मागे सात पायऱ्या आहेत. या पायऱ्यांना संगीत पायऱ्या असे म्हटले जाते. पायऱ्यांवर विशिष्ट पद्धतीने दगडाचा आघात केलास, ‘सा,रे,ग,म,प,ध,नि,सा’ असा आवाज उत्पन्न होतो. सदर पायऱ्यांना संरक्षक जाळी  ( मराठीत कंपाउंड)असल्यामुळे यातून येणारा आवाज ऐकू शकलो नाही.


 मंदिरात प्रवेश केल्या केल्या भिंतीवर दोन मूर्ती आहेत. या द्वारपाल असण्याचा अनेक लोकांचा गैरसमज होऊ शकतो. पण त्या आहेत स्कंद व पद्म निधी. या दोन्हीही समुद्र व गोड्या पाण्याचा जलाशय यांचे रक्षण करणा-या देवता आहेत. चोला राजासाठी पाणी हे अत्यंत महत्वाचे होते. चोला राजाचे राज्य अनेक देशांत होते. जसे की इंडोनेशिया, जावा, सुमात्रा.  त्यामुळे  स्कंद व पद्म निधीला महत्वाचे स्थान आहे.  त्यावेळी समुद्र ओलांडून जायला बंदीपण नव्हती.


त्याच्यापुढे ‘अर्धनारीनटेश्वराची’ मूर्ती आहे.
सभामंडप रथाच्या आकाराप्रमाणे बनवला असून घोडे ओढत आहे अशी उपमा कलाकारांनी दगडातून दाखवली आहे.
हे घोडे व रथांची चाके सहा वेगवेगळ्या दगडांपासून बनवलेली आहेत. सर्वसाधारणपणे एकाच दगडातून बनवायची पद्धत त्याकाळी रुढ होती. आणि अशाच पद्धतीची मूर्ती कोणार्क मध्येही आहे.


आतील खांबांवर वेगवेगळ्या प्रसंगांची चित्रे आहे जसं की मदन दहन  किंवा शिवाचे लग्न, गणपतीचे लग्न. मंदिराच्या पाठीमागे लिंगोद्भव  देवाची मूर्ती आहे. यांची कथा पण फारच सुंदर आहे. पण ती पुन्हा कधीतरी.

दृष्टिभ्रम करणाऱ्या अनेक मूर्ती या मंदिरात आहेत जसे की हत्ती आणि बैल (बदामीला ही हेच शिल्प आहे), एकच डोके, दोन हात व  सहा पाय असलेली मूर्ती, मृदुंग वाजवणारे तीन लोक पण पाय मात्र चार या व अशा अनेक दृष्टीभ्रम करणाऱ्या मूर्ती मंदिरात आहेत. 
हत्तीच्या धडावर हात ठेवून फोटो बघा व नंतर बैलाच्या धडावर हात ठेवून बघा





कैलास पर्वत हलवणा-या रावणाचीही मूर्ती या मंदिरात आहे. पण वेरूळच्या येथील असलेली गुणवत्ता व सुबकता या मूर्तीमध्ये दिसत नाही.
ऐरावतेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही कुंभकोणम बघण्यासाठी कुंभकोणम मध्ये परत आलो. येथे अनेक मंदिरे आहेत. हे मंदिरांचे शहर म्हणूनच ओळखले जाते.  येथे शंकरांची १२  मंदिरे आहेत. विष्षूची ५ मंदिरे आहेत.
या सर्वात महत्त्वाचे मंदिर म्हणजे  ‘आदी  कुंभेश्वर’. प्रलय होण्याच्या आधी ब्रह्मदेवाने वेगवेगळ्या जातीचे प्राणी एका कुंभात भरून ठेवले होते व त्याच बरोबर अमृतही ठेवले होते.  हा कुंभ त्यांनी कैलास पर्वतावर ठेवला होता. प्रलयामुळे तो कुंभ कैलास पर्वतावरून खाली आला आणि तो तसाच समुद्राला जातो की काय असे सर्व देवांना वाटले. शंकराने भिल्लाच्या रूपात या  कुंभांचा कोन फोडून जीवसृष्टी परत एकदा निर्माण केली.  तेच हे ठिकाण -कुंभकोणम.  या ठिकाणी असलेले शंकराचे लिंग हे शंकरांनी स्वतः स्थापन केलेले आहे. त्यामुळे त्याला विषेश महत्व आहे. मंदिरात पोहोचेपर्यंत ६ वाजले होते. यावेळेस आम्हाला येथील आरती बघायला मिळाली.  ही आरती अतिशय नयनरम्य होती. त्यानंतर शेजारील मंत्राबिंका (मंगला अंबिका?) ची पण आरती झाली. हे मंदिर साधारण ७व्या शतकांतील असावे. हे जरी चोला राजांनी बांधलेले असले तरी यांची देखरेख मदुराईच्या नायकांनी केली होती.
तेथूनच जवळ असण्या-या  ‘शारंगपाणी’या विष्णूच्या मंदिरात गेलो. मंदिर अतिशय छान आहे. परत खोलीवर आलो.

दुस-या दिवशी पाहिलेले, नटराज (चिंदबरम) व तरंगबडी हे नंतरच्या भागात…

Thursday, November 22, 2018

तामिळनाडू २०१८ -भाग -२

रंगनाथस्वामीमंदिराची माहिती जरा सविस्तर देत आहे.

पौराणिक माहिती
श्रीरामांच्या राज्याभिषेकाला बिभीषणापण आले होते. त्यांना आपल्या जवळची विष्णूची मूर्ती रामाने देऊ केली. ती मूर्ती घेऊन ते श्रीलंकेकडे निघाले असताना, श्रीरंगम् येथे थांबले. काही कारणाने ही मूर्ती इथेच थांबली. त्या मूर्तीला कुणालाही उचलता येईल. बिभीषणांना विष्णूने दृष्टांत दिला, मी कायमच तुझ्या राजधानीकडे म्हणजे दक्षिणेकडे पाहत राहीन, मला कावेरीच्या काठावर राहू दे. त्यामुळे मंदिर दक्षिणाभिमुख आहे.

वैष्णव संप्रदायात विष्णूच्या १०८ मंदिरांना अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यापैकी १०५ मंदिरे भारतात आहेत. एक मंदिर नेपाळमध्ये असून, राहिलेली दोन मंदिरे ही पृथ्वीच्या बाहेर आहेत असे मानले जाते. त्यापैकी एकाला क्षीरसागर म्हणजे दुधाचा सागर दुसरे परमपदम म्हणजेच वैकुंठ असे म्हणतात. या सर्व मंदिरांमध्ये जे मंदिर 'आदी' मंदिर म्हणजेच मुख्य मंदिर आहे, ते म्हणजे हे  रंगनाथस्वामी मंदिर. त्यामुळे या मंदिराला वैष्णवांच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेले विश्वकसेनाचे स्वतंत्र मंदिर. विश्वकसेना हा विष्णूचा मुख्य सेनापती आहे. मुख्य उत्सवाच्या एक दिवस आधी विश्वकसेना पूर्ण गावात फिरतातवाटेत असणाऱ्या सर्व दुष्ट वाईट शक्तींचा नाश करतात मुख्यमुर्तीसाठी रस्त्या सुरक्षित  होतो, असा येथील लोकांचा समज आहे. आणि उत्सवाच्या दिवशी हा विश्वकसेना संपूर्ण जगावर विष्णूच्या नावाने राज्य करतो. विश्वकसेनासाठी (उपदेवता) स्वतंत्र मंदिर हे चोला राजाच्या मंदिर बांधण्यातील एक वैशिष्टय आहे.

ऐतिहासिक माहिती
चोला राजाराजाराजा दोन (११४६- ११७३) ला दृष्टांत झाला व त्याप्रमाणे त्याने ह्या जागेवर खणून पाहता त्याला विष्णूची मूर्ती सापडली. त्याने येथे विष्णूचे मंदिर बांधले. साधारण हा  आकराशे ते बाराशेच्या आसपासचा काळ असावा. या नंतरच्या काळात मदुराईचा नायक, सुंदर पांड्या यांने या मंदिरासाठी 'गजकतुलावारा' केली. 'गजकतुलावारा' याचा अर्थ आपले व एक हत्तीच्या वजनाइतके सोन्या-चांदीचे दान मंदिरासाठी करायचे. त्यासाठी त्याने दोन नावांचा(boats) वापर केला. ती गोष्ट मोठी मनोरंजक व वैज्ञानिक आहे. गजकतुलावारा केल्यामुळे सुंदर पांड्याला हेमचंद्रा असेही म्हणू लागले. हेमचंद्रा याचा अर्थ मंदिरावर सोन चढवणारा. नंतरच्या काळात येथे अनेक मुसलमान राजांनी आक्रमण केली. त्यामधील एक दिल्लीचा सुलतान मलिक काफुर(?-१३१६). याने या देवळावर आक्रमण करुन येथील खजिना व त्याचबरोबर विष्णूची मूर्तीही पळवून नेली. ही मूर्ती त्याची मुलगी सुलतानी खेळण्यातील बाहुलीप्रमाणे वापरायची. या बाहुलीसाठी तिने कपडेही शिवून घेतले होते. ती बाहुली सतत तिच्या जवळ असायची. येथील लोकांनी राजाची मर्जी सांभाळून (नृत्य,कला दाखवून) त्याच्याकडून ती मूर्ती परत मागून घेतली. ही मूर्ती घेऊन ते श्रीरंगमला परत येत होतो. आपल्याकडील मूर्ती नाही हे सुलतानीला समजल्यावर ती तडकश्रीरंगम्ला आली. पण तोपर्यंत  मूर्ती तेथे आली नव्हती. हे पाहून तिने मंदिरातच आपले प्राण अर्पण केलेमुख्य पुजाऱ्याच्या स्वप्नात जाऊन विष्णूने सांगितले की ती पण माझी भक्त आहे आणि तिचा योग्य तो सन्मान केला जावा. त्यावेळेस पासून तिच्यासाठी मंदिराच्या आवारातच एक भिंत तयार करण्यात आली आजसुद्धा विष्णूला दाल (दाळ), रोटीचा प्रसाद दाखवला जातो. तसेच सकाळच्या वेळेस विष्णूला रंगीत लुंगीही नेसवली जाते. (या कथेबद्दल अनेक मते कथा आहेत). यानंतर विजयनगरच्या राजाने या मंदिराला विशेष अर्थसाहाय्य करून मंदिराचा फार मोठ्या प्रमाणात कायाकल्प केला. मंदिरातील शेवटच्या गोपूराचे बांधकाम अगदी अलीकडे म्हणजे १९८७ पर्यंत होत होते.

मंदिराची माहिती
आधी सांगितल्याप्रमाणे हे जगातील (पूजा केले जाणारे) सर्वात मोठे मंदिर आहे. मंदिर १५६ एकरावर पसरलेले आहे. साधारण १० किक्रेटच्या मैदाना इतके. या मंदिराला २१ गोपूर आहेत. त्यातील एक गोपूर २३७ फूट उंचीचे आहे




चोला नंतरच्या काळात  मंदिरांच्या गोपूरांची उंची ही मंदिराच्या कळसापेक्षा जास्त ठेवण्याची प्रथा रुढ झाली. सदर मंदिराचा विस्तार नंतरच्याच काळात जास्त झाला असल्याने, गोपूराची उंची जास्त आहे. दक्षिणेकडे मंदिराच्या कळसाला विमान असे म्हटले जाते. या कळसाला नाव देण्याचीही पद्धत आहे. जसं तिरुपतीच्या कळसाला आनंदनिलया किंवा कांचीपुरमच्या कळसाला पुण्याकोटी म्हणतात. तर या मंदिराच्या कळसाला प्रणवकार असे म्हणतात.
मघाशी सांगितल्याप्रमाणे विष्णूची महत्त्वाची १०८ मंदिरे आहेतत्यातील एक म्हणजे परमपदम(वैकुंठ).  या वैकुंठाला जाण्याचा एक मार्ग या मंदिरातून आहे.
मंदिराच्या मागच्या बाजूला एक सजवलेला  दरवाजा   त्या दरवाज्यावर असलेल्या दोन पाली आणि दारासमोर जमिनीवर केलेली पाच बीळे. या पाच बीळांत पाच बोटे घालून, पालीकडं बघत देवाला वैकुंठाचे दार उघडण्याची विनंती करणारे भाविक आज पण तुम्ही पाहू शकता. वैकुंठ एकादशीला या दरवाजातून जो जातो तो वैकुंठाला पोहोचतो अशी मान्यता आहे.

  पाच बीळे पाली या प्रतीकं असावीत. जो व्यक्ती आपल्या पंचेंद्रियांना काबूत करतो देवाच्या पायापाशी पालीप्रमाणे घट्ट धरुन बसतो. तो जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका करुन वैकुंठाला पोहचतो.
  मंदिराबद्दल अजूनही खूप माहिती आहे. जसे की रामानुजन, धन्वंतरी, सहस्त्र खांभाचे मंदिर , हग्रीव. पण ती माहिती लिहल्यास वाचकांना कंटाळा येईल. म्हणून ती माहिती देत नाही. कुणी हे मंदिर बघण्यासाठी जाणार असेल किंवा ही माहिती पाहिजे असल्यास मला सांगा.

मंदिर बघण्यात जवळजवळ दोन, तीन तास वेळ गेला. मंदिरापासून चेटराम (Chatram) बसस्थानकावर गेलो. तेथुन कालानाई (Kallanai) धरण बघण्यासाठी गेलो. या धरणाचे वैशिष्ट म्हणजे, हे चोला राजा करीकलन यांनी इसवीसन २०० व्या शतकात बांधले होते. म्हणजे आजपासून जवळजवळ आठशे वर्षांपूर्वी. धरणाची लांबी १००० फूट असून  उंची ६५ फूट होती. या धरणामुळे आजूबाजूच्या ७०००० एकर जमिनीला पाण्याचा पुरवठा मिळाल होता


    

















चोला राजे हे  शेतीला प्रोत्साहन देणारे होते. इंग्रजांच्या काळात याच मॉडेलचा वापर करून या धरणाची उंची दोन फूटाने वाढवण्यात आली. पूर्वीची उंची ६५ फूट होती ती आता ६७फूट आहे. या धरणाजवळ आजही तुम्ही सर अर्थर कॉटन यांचा पुतळा बघू शकता. राजा करीकलन अश्वारुढपुतळा बागेत बसवला आहे. पण हे धरण राजा करीकलन यांनी बांधले होते, असा नामोल्लेख पण कुठे नव्हता. कित्येक स्थानिक पर्यटकांचा समज असा होता की हे धरण  सर अर्थर कॉटन यांनी बांधलं. मला वाटतं हीच आपली शोकांतिका आहे. असो.






















हे धरण बघून आम्ही परत चेटराम बसस्थानकावर आलो. येथून  जवळच 'रॉक फोर्ट' (दगडावरील) गणपतीचे मंदिर आहे. मंदिरात जाण्यासाठी ३५०-४०० पायर्‍या आहेत


मंदिराच्या वर गेलं की पूर्ण तिरची आणि श्रीरंगम् शहराचे विहंगम दृश्य दिसतं



या मंदिराच्या गणपतीची आख्यायिका गोकर्ण महाबळेश्वरशी साधर्म्य सांगणारी आहे
श्रीरंगस्वामी यांची मूर्ती, ज्यावेळेस विभीषण श्रीलंकेत घेऊन चालले होते. त्यावेळेस ते संध्याकाळी स्नानसंध्या करण्यासाठी कावेरीच्या काठावर थांबले. जवळच असलेल्या गुराख्याच्या रूपातील गणपतीला विष्णूची मूर्ती दिली विभीषण स्नानसंध्या करु लागले. गणपतीने याचा फायदा घेऊन मूर्ती खाली ठेवली. आपली मूर्तीची चुकीच्या ठिकाणी स्थापन झालेली पाहून बिभीषण चिडले त्या गुराख्याच्या मागे धावून लागले. गुराखी येथे जवळच असलेल्या या दगडावर जाऊन बसला. बिभीषण त्याच्यामागे पळत जाऊन त्यानी त्या गुराख्याच्या डोक्यात एक बुक्की मारलीत्यावेळेस गुराखी आपल्या मूळ स्वरूपात म्हणजेच गणपतीच्या स्वरूपात येऊन दर्शन दिले. बिभीषणांनी गणपतीची माफी मागितली. गणपतीने श्रीरंग स्वामींचे मंदिर कावेरी तटावरच असावे असे बिभीषणाला सांगितले. मंदिरात गणपतीचे दर्शन घेऊन आम्ही परत खोलीवर आलो.

तंजावर जवळच होते, पण मला तंजावरला दोन दिवस लागतील असे वाटले. म्हणून आधी कुंभकोणम बघण्यासाठी ११ नोव्हेंबरला निघालो. कुंभकोणमबद्द्ल पुढील लेखात.

Tuesday, November 20, 2018

तामिळनाडू २०१८ -भाग -१

Don't follow my path follow my direction.
असं कुणीतरी म्हटलेलं आहे. आता हे कुणीतरी म्हणजे एखाद्या वेळेस मीच असू शकतो. ब्लॉगची सुरुवात इंग्लिश मध्ये केल्यावर वाचण्याची शक्यता जास्त असते म्हणून मी सुरुवातीला इंग्लिश वाक्य  टाकलं.
साधारण तीन महिन्यापूर्वी मला तिरुपतीच्या सुप्रभातच्या दर्शनाची सोडत (म्हणजेच मराठीतली लॉटरी) लागली.
आणि मग सहलीचे नियोजन सुरू झाले. तिरुपतीच्या दर्शनाची वेळ निश्चित असल्यामुळे बाकीच्या गोष्टी त्यानुसार जुळवून घ्याव्या लागल्या. त्यामुळे मी जसा प्रवास केला तसा करु नका, शेवटी मी योग्य असा प्रवासाचा मार्ग देणार आहे.  म्हणूनच Don't follow my path follow my direction.

सहलीची सुरुवात पुदुचेरीने केली.  पुदुचेरीची गाडी पुण्याहून रात्री बारा वाजता होती (४ नोव्हेंबर २०१८). नेहमीप्रमाणे  गाडीत पत्त्यांचे डाव झाले. गाडी व स्टेशने बरीच स्वच्छ होती.  प्रवास करत सकाळी साडेआठ वाजता (६ नोव्हेंबर २०१८) पुदुचेरी येथे पोहचलो. रेल्वेस्टेशनापासून श्री अरविंदो आश्रम साधारण एक किलोमीटरवर आहे.  सर्व सामान घेऊन आम्ही श्री अरविंदो  आश्रमात पोहोचलो. आश्रमाच्या समोरच समुद्र असल्यामुळे सर्व सामान खोलीत टाकून, आम्ही पहिल्यांदा समुद्रस्नानासाठी गेलो.  दोन-तीन तास मस्तपैकी समुद्रात मनसोक्त खेळल्यानंतर खोलीवर येऊन आंघोळ केली. समुद्रकिनारा आपल्यापेक्षा (म्हणजेच कोकण किना-यापेक्षा) खूपच स्वच्छ आहे पण समुद्र थोडासा उथळ असल्यामुळे समुद्रात जास्त आत जाता आले नाही. आम्ही आश्रमात जाण्यासाठी तयार झालो.

आधी पोटाबा आणि मग विठोबा या प्रमाणे येथे जवळच असलेल्या उपहारगृहात (A2B) जेवण-खाण करून मग दर्शनासाठी आश्रमात निघालो. आश्रमाच्या खोल्या  घेतल्यामुळे त्या आश्रमाच्या जवळच होत्या.  चालतच  श्री अरविंदो आश्रमात गेलो. जवळपास पन्नास ते साठ माणसे समाधी जवळ होती, पण तरीही असलेली शांतता बघून मन आध्यात्मिक वातावरणात बुडून गेल. खरं तर "समाधी शांतता"  (“स्मशान शांतता” च्या धर्तीवर) असा मराठीत शब्द असता तर तो वापरला असता.   या शांततेसाठी मला दुसरा चांगला शब्द सुचत नाही. समाधीजवळ १०-१५ मिनिटं बसलो, पण मनाला जी शांतता मिळाली ती शब्दात काही वर्णन करता येत नाही. आश्रमातून बाहेर आल्यावर २-४ मिनिट कुणीच कुणाशी बोलले नाही. अगदी परत परत घेण्यासारखा अनुभव.

येथे जवळच एक अतिशय सुंदर असे गणपतीचे मंदिर आहे.  मंदिरापाशी गेल्यावर लक्षात आलं की मंदिर दुपारी १ ते ४ बंद असतं. पुण्यात राहत असल्यामुळे या गोष्टीच फारस विशेष वाटलं नाही.
आधी झालेली पोटाची मनसोक्त पूजा व नंतरची मनाची पूजा यामुळे आम्ही सर्व भारावून गेलो. लगेच काही बघण्यासारखे नसल्याने  सर्वांनी खोलीवर जाऊन ध्यानमग्न अवस्थेत योगीक निद्रा घेतली काही लोक याला झोपणे असंही म्हणतात. 
संध्याकाळी विनायक मंदिर बघून,  आम्ही पुळणीवर म्हणजेच ज्याला आपण मराठीत बीच म्हणतो तेथे फिरायला गेलो. जवळच असलेले फ्रेंच मेमोरियल पाहिले व किनाऱ्यावर संध्याकाळपर्यंत भटकत राहिलो. 
विनायक मंदिरात छतावर काढलेले चित्र




दुस-या दिवशी सकाळी लवकर उठून ओरोविलला रिक्षाने गेलो.  ओरोविल शहरापासून बारा किलोमीटरवर  आहे.  ओरोविलला उषानगरीपण म्हणतात. पण येथे  ओरोविल याच नावाने जास्त प्रसिध्द आहे. या शहराची स्थापना मीरा रिचर्ड  (म्हणजेच "मां") यांनी १९६८ साली केली. मां या श्री योगी अरविंदाच्या इतक्याच आध्यात्मिक उंचीवर पोहचलेल्या योगी स्त्री होत्या.  ओरोविल येथे सर्व स्त्री-पुरुष, सर्व जाती, राजनैतीक विचारसरणी व राष्ट्रीयता याला काहीच महत्व नाही. हे मानवतेचे गाव आहे.
येथे ध्यानासाठी मातृमंदिर आहे. मातृमंदिराच्या आत जाण्यासाठी पास एक-दोन दिवस आधीच घ्यावा लागतो.  ही जागा "प्रशांत क्षेत्र" म्हणून ओळखली जाते. मातृमंदिराला बारा पाकळ्या आहेत. भविष्यात आजूबाजूला झरे, बाग करण्याचा विचार आहे.  मातृमंदिराकडे जाताना मार्गात असलेल्या पाट्या अप्रतिम होत्या. 
मातृमंदिर

'मां'नी काढलेली काही चित्रे सुध्दा जवळाच्या दालनात लावलेली आहेत.  'मां'नी 'योगी व सर्वसामान्य माणसाचा मोक्षापर्यंत जाण्याचा मार्ग' हे चित्र अप्रतिम.

ओरोविल बघून परत खोलीवर आलो. येताना पुदुचेरी वस्तुसंग्रहालय बघितले.  संग्रहालय छान आहे. 
संध्याकाळचा वेळ रिकामा होता. गावातच असलेली बाग बघण्यासाठी गेलो. बागेची जागा आणि असलेल्या सुविधा छान आहे पण बाग पूर्णपणे दुर्लक्षित असल्याने तिला 'दुर्लक्षित बाग' असेही म्हणता येईल. बागेतील  मत्स्यगृह म्हणजे अॅक्वॅरियम फक्त चांगले आहे.
आठ नोव्हेंबरला सकाळी पुदुचेरी सोडले. पुदुचेरीवरून कांचीपुरम मार्गे तिरुपतीला पोचतो.
                            

 तिरुपतीला पोहोचण्यास साधारण संध्याकाळचे साडेपाच वाजले होते.  खोली आधीच आरक्षित  केलेली  होती. रात्री साडेबारा एक वाजता उठून अंघोळ करून आम्ही सुप्रभातमच्या रांगेत उभा राहिलो.  देवळापाशी पोहोचेपर्यंत तीन-साडेतीन वाजले होते. देवाचे दार ब्रह्ममुहूर्तावर, आपल्यासमोर उघडल्यानंतर सुप्रभातम् म्हणून देवाला उठवतात  आणि आलेल्या सर्व भक्तगणांना देवाचे दर्शन घेण्यासाठी गाभार्‍यापर्यंत जाऊ देतात. या वेळेस बालाजीच्या अंगावर फक्त उत्तरीय (एकच वस्त्र) असल्यामुळे बालाजीची शाळीग्रामाची मूर्ती बघण्याचे सौभाग्य फक्त आणि फक्त सुप्रभातमच्या वेळेस मिळत. हे दर्शन अतिशय विलोभनीय असतं. हे दर्शन घेऊन आम्ही तिथून बाहेर पडलो बाहेर येताना एक छोटा लाडू प्रसाद दिला जातो. त्यानंतर अकरा वाजता नेहमीचे दर्शन घेतले. त्या दर्शनाला ह्या वेळेस फार काही उशीर लागला नाही. साडेबारा-एक पर्यंत आमचे दर्शन झालं. प्रसाद घेऊन आम्ही खोलीवर दोन वाजेपर्यत पोहचलो. 
तिरुमलावरुन आम्ही संध्याकाळी तिरुपतीला आलो. तिरुपतीहून घरातील बाकीची मंडळी परत पुण्याला आली. आम्ही तिकडून रेणुगुंटाला आलो व तिरुचीनापल्लीला (तिरचीला) जाणा-या रेल्वेत बसलो. सकाळी सात वाजता तिरचीला पोचलो. या जंक्शनवरुन 3 स्टेशन पुढे असलेल्या श्रीरंगम् या गावी गेलो. श्रीरंगम् हे गाव म्हणजे दोन नद्यांच्या मधल्या जमिनीवर (बेटावर) वसलेलं गाव. 

राहायची सोय आधीच केली असल्यामुळे आम्ही तेथे पोचलो. सकाळी आंघोळ करुन आम्ही दर्शनासाठी निघालो. येथे 'रंगनाथस्वामी ' यांचे मंदिर आहे. या मंदिरात विष्णू शेषावर पहुडलेला आहे. हे जगातील पूजाअर्चा चालू असलेले सर्वात  मोठे मंदिर आहे. या मंदिराबाबत पुढच्या लेखांत.